ब्रेकिंग न्यूज-: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा...
Breaking News-: Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray finally resigned from the post of Chief Minister ...
X
म मराठी न्यूज नेटवर्क
गेल्या १० दिवसांच्या सत्ता नाट्याचा अंक आता संपुष्टात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि १० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे. शिंदे गटाने ३९ आमदारांसह बंड पुकारल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारने बहुमत सिद्ध करावे असं सांगितलं. त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या बाजूने न लागल्याने उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची नामुष्की आली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
आपल्या सर्वांच्या सहकार्यानं वाटचाल केली. सरकार म्हणून छत्रपती शिवरायांच्या रायगडला निधी देऊन कामाला सुरुवात केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, त्यांना कर्जाच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेचा बीड पॅटर्न सुरु केला. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं, ते औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर केलं. उस्मानाबादचं धाराशीव असं नामांतर केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सर्व चांगलं सुरु असताना काही जणांची नजर लागली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेसचे सोनिया गांधी यांचे आभार मानतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यासोबत विधानपरिषदेचा राजीनामा दिला. आरंगाबादच्या नामांतराचा ठराव मांडला त्यावेळी शिवसेनेचे केवळ आम्ही चार जण होतो, याचा खेद वाटला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मी, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, अनिल परब उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी ठरावाला एका शब्दानं विरोध केला नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटले.रिक्षावाले, हातभट्टी वाले यांना नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, मंत्री, ज्यांना मोठं केलं, ज्यांना सत्ता दिली, ती लोकं नाराज झाली आहेत. ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना काही दिलं नाही ते हिमतीने समोर, याला म्हणतात माणुसकी, शिवसेना, शिवसैनिक असं उद्धव ठाकरे म्हणाले.न्यायदेवतेचा निर्णय आला, उद्या राज्यपालांचा फ्लोअर टेस्टचा आदेश आला आहे. राज्यपालांनी लोकशाहीचा मान राखत पत्र मिळताच २४ तासात पत्र दिलं आहे. विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी लटकून पडली आहे. राज्यपालांनी तो निर्णय घेतला असेल तर आम्हाला त्यांच्या बद्दल असलेला आदर द्विगुणित होईलस असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंचे सर्व प्रयत्न निष्फळ...
गेल्या १० दिवसात ठाकरे सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनेक प्रयत्न केले, मात्र ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. एक अखेरचा प्रयत्न म्हणून उद्धव ठाकरेंनी काल बंडखोर शिवसेना नेत्यांना भावनिक सादही घातली. मात्र, बंडखोर शिंदे गट त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर भाजपने खेळी केली. देवेंद्र फडणवीसांनी २८ जूनच्या रात्री राज्यपालांना पत्र देत ठाकरे सरकार अल्पमतात असल्याने त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावं अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत उद्या विशेष अधिवेशन घेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले.
राज्यपालांच्या या आदेशाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यावर ठाकरे सरकारला काहीही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
राजकारणाचा सुपरहिट सिनेमा, हिरो कोण आणि व्हिलेन कोण?
भाजप-शिवसेना युतीचं पाच वर्षांचं सरकार, त्यानंतर अडीच-अडीच वर्षांचा प्रश्नावरुन या युतीत पडलेली फूट, त्यानंतर शिवसेना -राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून स्थापन केलेलं ऐतिहासिक असं महाविकास आघाडी सरकार आणि आता पुन्हा अडीच वर्षांनंतर शिंदे गटाच्या बंडाळीमुळे मविआची ताटातूट. या काही वर्षात महाराष्ट्राने राजकारणाचा अॅक्शन, कॉमेडी, थ्रील, सस्पेन्स, ड्रामा असलेला सुपरहिट सिनेमा पाहिला. यामध्ये वेळोवेळी हिरो आणि विलेनची भूमिका बदलताना आपण पाहिली. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस हे हिरो होते. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसताच फडणवीस विरोधी भूमिकेत दिसले. महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाविकास आघाडीचे हिरो ठरले. त्यांनी अडीच वर्ष सत्ता टिकवून ठेवली. मात्र, राजकारणातले चाणक्य मानले जाणाऱ्या फडणवीसांनी पुन्हा एकदा सूत्र आपल्या हातात घेतली आणि अखेर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.काँग्रेस, राष्ट्रवादी आपल्यासोबत पण पाठीत खंजीर आपल्याच लोकांनी खुपसला | उद्धव ठाकरे